
लागण
मी खिडकीत उभा होतो, कारण मला बाहेर पाहायचं होतं म्हणून नाही, तर अंतर्मन आधीच सावध झालं होतं. जळगावची ती उन्हाळ्यातील संध्याकाळ नेहमीसारखीच असायला हवी होती. रस्त्यांवर पसरलेली उष्ण हवा, धुळीचा मंद वास, पिवळसर स्ट्रीटलाईट्स, दूर कुठेतरी स्कूटरचा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं. सगळं ओळखीचं. पण तरीही काहीतरी चुकत होतं.
खिडकीतून खाली पाहिलं आणि मला ते दिसलं.
लोक,
खूप लोक.
ते मरगळल्या सारखे, पण ठरावीक पद्धतीनं चालत होते. वर्तुळात. अंडाकृती आकारात. कुठे जायचंय हे माहीत नसल्यासारखे, पण चालणं थांबवायचं नाही असा हट्ट धरल्यासारखे. कुणी बोलत नव्हतं. कुणी थांबत नव्हतं.
आणि मग मला ते मूल दिसलं.
रस्त्याच्या मधोमध पडलेलं. अगदी लहान. न हलणारं. झोपल्यासारखं. पण झोप नव्हती ती. लोक त्यावरून चालत होते. कुणी थोडं वाकून पाहिलंही नाही. कुणी थांबलं नाही.
त्या क्षणी मला कळलं.
ते लोक आजारी नव्हते.
ते घाबरलेले हि नव्हते.
ती माणसं राहिलेली नव्हती.
ती संक्रमित झालेली होती.
झोम्बी.
चित्रपटातले ओरडणारे राक्षस नाहीत. शांत, चालणारे, दिसायला माणसांसारखेच. पण आतून रिकामे.
माझ्या मागे, घरात माझे आईवडील उभे होते. तेही बघत होते. पण त्यांना काहीच कळत नव्हतं. ते म्हणत होते, ‘गरीब लोक आहेत’, ‘काहीतरी आंदोलन असावं, ’मोर्चा असावा, ‘आपण विचारूया’.
माझ्या अंगावर काटा आला.
‘त्यांना हात लावू नका,’ मी म्हणालो. ती माणसं राहिलेली नाहीत.’
ते हसले. दया वाटली त्यांना.
मग एकाने वर पाहिलं.
माझ्याकडे.
मग दुसऱ्याने.
मग सगळ्यांनी.
दारावर टकटक झाली.
हळू.
सभ्य.
वडिलांनी दार उघडलं.
ते आत आले.
त्या क्षणी माझ्या आत काहीतरी चमकले. मी हातात मिळेल ते उचलून मारायला सुरुवात केली. लाकडी काठी, लोखंडी सळई, जे मिळेल ते. ते रडत नव्हते. ओरडत नव्हते. फक्त पुढे येत होते.
वेळ थांबली होती.
माझे हात थकले.
माझा श्वास तुटत होता.
पण मी थांबलो नाही.
मागच्या दारातून ते पुन्हा आले.
मागे आग लागली.
जळत असतानाही ते चालत होते.
मी त्यांना ढकलत राहिलो.
आणि मग आकाशातून चमत्कारिक वस्तू पडली.
ते थांबले.
कोसळले, निपचित झाले.
शांतता.
मी जमिनीवर बसलो.
आणि जागा झालो.
घामेजलेला.
दमलेला.
"ते फक्त एक स्वप्न होतं... पण त्या एका स्वप्नाने माझ्यातलं सगळं काही बदलून टाकलं.
मला उमजलं की, खरी लागण कोणात्या विषाणूमुळे किंवा दातांनी चावा घेतल्यामुळे लागत नाही; ती लागण होते आपल्या 'दुर्लक्ष' करण्यामुळे. जेव्हा आपण समाज म्हणून चुकीच्या गोष्टींकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतो, तेव्हा हा रोग पसरतो, पाप पुण्य व पुण्य पाप वाटायला लागते.
घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, घर म्हणजे एक 'मर्यादा' असते; आणि प्रत्येकालाच ती सीमा मान्य नसते, ती लक्ख डोळे उघडे ठेऊन ओलांडावी लागेल, वास्तवात कोणता चमत्कार होणार नसतो.
मी आता पूर्णपणे जागा झालोय. झोम्बींच्या भीतीने नाही, तर माझ्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून. मी पुन्हा इतरांसारखा 'जिवंत प्रेत' होऊ नये, इतकीच धडपड आहे."
No comments:
Post a Comment